Sunday, June 19, 2011

(९५) वार्‍याने हलते रान.......................पावसाने भिजते गाव



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



वार्‍याने हलते रान पावसाने भिजते गाव



वार्‍याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले
गाईचे डोळे करुण उभे की, सांज निळाईतले

डोळयात शीण, हातात वीण, देहात फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणून, निघे बैरागी

वाळूत पाय, सजतेस काय, लाटांध समुद्रकाठी
चरणात हरवला गंध, तुझ्या की ओठी

शून्यात गरगरे झाड, तशी ओढाळ, दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद, तुझा की वैरी

कवी : ग्रेस


पावसाने भिजते गाव, माझे सामसूम फुप्फुस आनंदले
बैलाचे कान कृद्ध बसती की, सकाळ केशरीतले

कानात वारे, हातात तारे, मुडद्यात फळांच्या भेगी
उजेड यावा म्हणून, बसे भोगी

पाण्यात हात, थिजतेस काय, निश्चल तळ्याकाठी
कुरणात सापडला डिंक , माझ्या की पोटी

लाखात फडफडे वेल, अशी खट्याळ, अंधारनगरी
खांद्यावर चंडांशु , माझी की शायरी


टीप :

मराठी विषय शिकवणारी चोखंदळ प्राध्यापकमंडळी आणि शत्रूराष्ट्रांचे सांकेतिक भाषांमधले पत्रव्यवहार हस्तगत केल्यानंतर ते उमजवून घेण्याचे असामान्य कौशल्य कमावलेली केंद्रसरकारी संरक्षणखात्यातली मोजकी माणसे वगळता इतर वाचकांना उजवीकडची गंमतिका आणि डावीकडची कविता ह्या दोन्ही शब्दरचना जरी समप्रमाणात अनाकलनीय भासल्या तरी आपली गंमतिकाही डावीकडच्या कवितेइतकीच अर्थपूर्ण असल्याचा गंमतिकाकारांचा दावा आहे.


No comments:

Post a Comment