Thursday, June 27, 2013



(२२४ )आपलं गाणं.............................................भेळेचा प्रभाव






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.







आपलं गाणं भेळेचा प्रभाव



गाय जवळ घेते नी वासरू लुचू लागतं
आपण गाऊ लागतो नी गाणं सुचू लागतं

गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो
गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो
जनात गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता
मनात गायलात म्हणून तुम्ही छोटे नसता
एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते
आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही म्हटलं पाहिजे

असंच असलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं
असंच नसलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं
गात गात केव्हाही जाता येतं
आपलं गाणं केव्हाही गाता येतं.
एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं
धुणी वाळत घालताना गाणं म्हणता येतं
चुलीपुढे रांधताना गाणं म्हणता येतं
मच्छरदाणी बांधताना गाणं म्हणता येतं
जेव्हा आपला सूर लागतो बाथरूममध्ये न्हाताना
भरली बादली डुलू लागते आपण गाणं गाताना.
फांदीतून पान फुटावं तसं गाणं फुटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे

तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं
त्याच क्षणी दोघांनाही गाणं कळतं
माझ्या पावसात मग तुम्ही न्हाऊ लागता
तुम्हीच माझ्या गळ्यातून गाऊ लागता
कधी गाणं मिठीचं कधी आतूर दिठीचं
कधी गाणं एकाचं कधी एकमेकाचं
गाणं हेच गाण्याचं मोल असतं
गाण्यापुढे बाकी सारं फोल असतं
फूटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही
द्वेष करून गाण्याला शापता येत नाही
झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे

पण एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते
आपलं गाणं आपल्यालाच पटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे.

कवी : मंगेश पाडगांवकर








मूल रेतीत बसतं नी किल्ला एक रचू लागतं
आपण भेळ खाऊ लागतो नी गाणं चटकन सुचू लागतं

गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो
गाणं तसं रानातही आपण गाऊ शकतो
जनात गायलात म्हणून तुम्ही गायक नसता
रानात गायलात म्हणजे तुम्हा तिथे श्रोते नसतात
एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते
आपलं गाणं आपल्याला सुचलं पाहिजे
आणि त्याकरता भेळ चवदार आपण नक्की खाल्लीच पाहिजे

असंच असलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं
असंच नसलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं
गात गात केव्हाही जाता येतं
-- अर्थात रस्ता निर्जन असेल तेव्हा.
एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं
भांडी घासत असताना गाणं म्हणता येतं
केर काढताना गाणं म्हणता येतं
हवेत किल्ले बांधताना गाणं म्हणता येतं
जेव्हा आपला सूर लागतो बाथरूममध्ये न्हाताना
भरली बादली रडू लागते आपलं गाणं ऐकताना.
बेंबीतून गवत फुटावं तसं गाणं फुटलं पाहिजे
उपटल्या गवताचं जे करतो ते मग त्याचं केलं पाहिजे

तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं
त्याच क्षणी दोघांनाही कळतं
गाणं माझं भिकार किती ते.
मग तुम्ही तुमचंच गाणं गाऊ लागता
कधी गाणं मिठाचं कधी चण्याच्या पीठाचं
कधी गाणं चाकाचं कधी गाणं चाकूचं
गाणं हेच गाण्याचं मोल असतं
जसं ओल्या हरभर्‍यावरचं फोलपट असतं
फूटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही
सुरी घेऊन गाण्याला कापता येत नाही
आळंब्यागत मातीतून गाणं फुटलं पाहिजे
आणि सगळीकडे आळंबीच आळंबी असं झालं पाहिजे

पण एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते
आपलं गाणं आपल्याला सुचलं पाहिजे
आणि त्याकरता भेळ चवदार आपण नक्की खाल्लीच पाहिजे







No comments:

Post a Comment